Purchase of new land : १ फेब्रुवारी २०१९ च्या निकषामुळे नवीन जमीन खरेदीदार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभापासून (Purchase of new land) वंचित राहत असल्याचा मुद्द्याकडे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्ष वेधले असता, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे राज्यातील हजारो नवीन शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या नियमांनुसार, १ फेब्रुवारी २०१९ नंतर ज्यांनी जमिनीची खरेदी केली आहे, असे शेतकरी या दोन्ही योजनांच्या लाभासाठी अपात्र ठरत आहेत. परिणामी, शेती विकत घेऊन नव्याने शेती करू इच्छिणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात होती. आमदार आवताडे यांनी या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान सभागृहात मांडले आणि निकषांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या केंद्राच्या निकषांमुळे नवीन खरेदीदार शेतकरी तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरत आहेत ही बाब वस्तुस्थिती आहे. मात्र, हा अडसर दूर करण्यासाठी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी निकषांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल.