प्रभात वृत्तसेवा पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये लागणार असून, यासाठी राज्य सरकार आता कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. हे कर्ज हुडकोकड़ून घेण्याचा विचार असून, मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार असून, यासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनी संपादित करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात जमिनीचा वाढीव एकरी दर, तसेच परताव्यापोटी देण्यात येणाऱ्या दहा टक्क्यांऐवजी वाढीव जमीन देण्यास राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वी ५ हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता हा खर्च एक हजार कोटी रुपयांनी वाढून ६ हजार कोटी रुपये झाला आहे. यासाठी राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मान्य केल्यानंतर हुडकोकडे पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कर्ज मंजूर झाल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होईल असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.