Arvind Kejriwal – पश्चिम बंगालमधील विजयानंतर आत्मविश्वासात असलेल्या भारतीय जनता पक्षावर अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली आहे. भाजपने लोकशाहीचे अपहरण करून तिची हत्या केली असून, त्यांचा विजयाचा रथ पंजाबमध्ये रोखला जाईल, असे ‘आप’च्या राष्ट्रीय संयोजकांनी मंगळवारी ठामपणे सांगितले. केजरीवाल यांनी दावा केला की, भाजपने पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे निवडणुकीत फेरफार केले, तसेच प्रयत्न त्यांनी दिल्लीतही केले होते. आज देशात लोकशाही धोक्यात आहे. २०१४ मध्ये मोदींची मोठी लाट होती, तरीही २०१५ च्या दिल्ली निवडणुकीत त्यांना केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. पंजाबमध्ये जर भाजप सत्तेत आला, तर ते राज्य उद्ध्वस्त करतील, असा इशारा त्यांनी दिला. modi केजरीवाल यांनी एक मोठे राजकीय भाकीत करताना म्हटले की, येणारी पंजाब विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान मोदींची शेवटची निवडणूक ठरेल. पंजाबच्या निकालानंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळेल. सध्या पंजाबमध्ये सरकारविरोधी नव्हे, तर सरकारच्या बाजूने लाट असून गावागावात विकासाची कामे पोहोचली आहेत, असा दावाही त्यांनी केला. पक्षांतरावरून हल्लाबोल : अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘आप’च्या खासदारांचा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले की, भाजपने या जागा पंजाबच्या जनतेकडून लुटल्या आहेत. पंजाबने ऐतिहासिकदृष्ट्या अनेक परकीय आक्रमणे परतवून लावली आहेत. मात्र, यावेळी शत्रू देशांतर्गत असून पंजाबी जनतेलाच त्यांना रोखावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही उपस्थितांना संबोधित केले. मान यांनी आजच राष्ट्रपतींची भेट घेऊन पक्षांतर करणाऱ्या सहा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी २०२७ च्या पंजाब निवडणुकीतही बंगालसारखाच विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.