पुणे – शहरातील विविध भागांमध्ये रात्री 9 वाजता सोसायटी, घरांमधील लाईट बंद होत होते. त्याचवेळी घरांच्या टेरेस, गॅलरी, अंगणात दिवा लावत आणि मोबाइलचा टॉर्चसह नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
यापूर्वी 22 मार्चला जनता कर्फ्यूचे निमित्त साधत पंतप्रधान मोदी यांनी टाळी, थाळी किंवा घंटानाद करावा, असे आवाहन केले होते. त्यालाही देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर रविवारी (दि. 5) रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद करून 9 मिनिटे पणत्या, दिवे, मेणबत्ती, टॉर्च, मोबाइलचे फ्लॅश लावावेत, असे आवाहन केले होते.
याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये सामान्य पुणेकरांसह शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील दिग्गजांनीदेखील दिवे, मेणबत्त्या प्रज्वलित करत यामध्ये सहभाग घेतला. मात्र, यादरम्यान काही उत्साही नागरिकांना “सोशल डिस्टन्सिंग’चा विसरच पडला होता. इतकेच नव्हे तर, रविवारी “सोशल मीडिया’वर देखील नागरिकांनी स्टेटस अपडेट केले होते.
नागरिकांनी प्रवेशद्वाराबाहेर, बाल्कनीमध्ये पणत्या लावल्या होत्या. अनेकांनी टेरेसवर जाऊन मोबाइल फ्लॅश लावले, दिवे प्रज्वलित केले. काहींनी तर थेट सोसायट्यांमधील लाइट बंद केले. काही अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवायला सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी “गो करोना’च्या घोषणा दिल्या. तर काही सोसायट्यांनी धार्मिक पद्धतीने मंत्रोच्चार आणि शंखनाद केला. दिवा हा अंध:कारातून प्रकाशकडे नेण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देश करोनारूपी अंध:कारातून बाहेर यावा, यासाठी नागरिकांनी प्रार्थना केली.