तीन महिन्यांपासूनचे पगार थकले
ऐन सुट्टीत प्रवाशांची गैरसोय होणार
पुणे – आर्थिक अडचणीत सापडलेल्या “जेट एअरवेज’ या विमानकंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुमारे तीन महिन्यांपासूनचे पगार थकीत आहे. त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी “काम बंद’ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर कंपनीने अनेक उड्डाणेही रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून “जेट एअरवेज’ ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. याचा परिणाम अनेक उड्डाणांवर होत आहे. त्याचबरोबरीने या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचे सुमारे तीन महिन्यांपासूनचे वेतन देखील थकीत आहे. त्यामुळे अखेरीस कर्मचाऱ्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयांमुळे मात्र प्रवाशांची कोंडी होत आहे.
“जेट एअरवेज’ची पुण्याहून दैनंदिन 21 उड्डाणे होत होती. त्याची संख्या कमी होत, गेल्या काही दिवसांमध्ये केवळ दिल्ली, मुंबई, अबुधाबी आणि सिंगापूरला उड्डाणे झाली. मुंबई आणि दिल्लीचे उड्डाण दि.30 मार्चपर्यंत सुरू होते. मात्र 31 मार्च रोजी पुण्यातून “जेट एअरवेज’चे दिल्ली आणि मुंबईसाठी एकही उड्डाण झाले नाही.
नवीन वेळापत्रकानुसार, 31 मार्चपासून अबुधाबी आणि सिंगापूरच्या उड्डाणाचा समावेश होण्याची शक्यता होती. परंतु 31 मार्च रोजी एकही उड्डाण झाले नाही.
दरम्यान, पुण्यातून जेट एअरवेजची इंदूर सेवा 31 मार्चपासून असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र त्याचेही उड्डाण झाले नाही. त्यामुळे येत्या काळात अन्य मार्गांवरही उड्डाणे होणार की नाही, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.