पुणे- मुक्तहस्ते “ऑक्सिजन’ देणारी झाडे आणि टेकड्यांचे अस्तित्त्वच आता काही उपद्रवी आणि नतद्रष्ट लोकांना नकोसे वाटते. त्यामुळेच या टेकड्याच्या टेकड्यांना आग लावण्याचा प्रकार या कंटकांकडून होताना दिसतो. खरेतर उन्हाळ्यात या वणव्यांचे प्रमाण जास्त असते परंतु यंदा डिसेंबरमध्येच हे “मॅनमेड’ वणवे पेटल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरात सुमारे 73 ठिकाणी वणवे लागल्याची नोंद वनविभागात झाली असून, त्यामुळे 340 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. सामान्यत: उन्हाळ्यात वणवे लागण्याचे प्रमाण जास्त असते. वणवे विविध कारणाने लागतात. झाडांचे खोड एकमेकांवर घासून होणाऱ्या घर्षणातून आगीची ठिणगी निर्माण होते, किंवा वीज पडूनही अनेक ठिकाणी वणवे पेटतात. परंतु शहरी भागात असलेल्या वनविहारांमध्ये, हिरव्यागार, ऑक्सिजन देणाऱ्या टेकड्या समाजकंटकांकडूनच पेटवल्या जातात. सुमारे 80-85 टक्के वणवे हे माणसांच्या चुकीमुळेच लागतात. या ठिकाणी जाऊन सिगारेट पिणे, शेकोटी पेटवणे, जाणूनबुजून आग लावणे असे प्रकार होताना दिसतात. नैसर्गिक वणव्यांचे प्रमाण 15-20 टक्केच असते. यामध्ये झाडे तर मरतातच परंतु त्यावर अधिवास असणारे प्राणी, पक्षी, कीटक यांचाही होरपळून दुर्दैवी मृत्यू होतो. करोना काळात नागरिकांना बाहेर पडताच येत नसल्याने सुदैवाने वणवा लागण्याचे प्रमाण नव्हते परंतु गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा हे अपप्रकार सुरू झाले असून, 133 ठिकाणी वणवे लागल्याची नोंद वनविभागात करण्यात आली आहे.
पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या टेकड्यांवर गेल्या काही दिवसांपासून वणव्याचे प्रकार घडत आहेत. त्यामध्ये सिंहगडच्या आजूबाजूच्या टेकड्या, वाघोली, कोंढवा भागातील टेकड्या, बावधन, भूगाव, पाचगाव पर्वती, वेताळ टेकडी यांचाही त्यामध्ये समावेश आहे.
वणवा लागल्यानंतरच्या उपाययोजना
टेकड्यांवर नियमित फिरायला जाणाऱ्या आणि तेथे आजूबाजूला राहणाऱ्या जागरूक नागरिकांचा वनविभागाने व्हॉटसऍप ग्रुप बनवला आहे. त्यावर माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडून तात्काळ “ऍक्शन’ घेतली जाते. याशिवाय “सोशल मीडिया’करही यामध्ये आता बरेच सक्रीय झाल्याचे चित्र आहे.
वणवे लागण्याला सुरूवात झाली आहे. तो कसा विझवावा याची कार्यशाळा वनविभागातील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आली आहे. याशिवाय अशाप्रकारच्या घटना रोखता याव्यात यासाठी गेल्या वर्षी वनविभागाकडून “वणवा परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पर्यावरणप्रेमी, टेकडी प्रेमी ग्रुप, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, टेकड्यांवर रोज चालायला जाणारे नागरिक यांचा समावेश केला होता. त्यांना देखील याविषयी माहिती देण्यात आली आहे.
– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग