Pune : प्रत्यक्ष न्यायदानातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग

पुणे : न्यायसंस्थेतील कामात व प्रत्यक्ष न्यायदानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणामकारक उपयोग केला जात आहे. तसेच, कायद्यातील संशोधन हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांच्या सहाय्याने अधिक व्यापक झाले आहे, असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले.
इंडियन लॉ सोसायटी व आयएलएस लॉ कॉलेजतर्फे प्रतिवर्षी स्व. एस.पी.साठे यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात चंद्रचूड बोलत होते. यावेळी इंडियन लॉ सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस.व्ही. कानेटकर,आयएलएस महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दीपा पातुरकर, इंडियन लॉ सोसायटीच्या सचिव वैजयंती जोशी उपस्थित होत्या.
चंद्रचूड यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा न्यायदानाच्या कामात वापर करताना निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्नांचाही उहापोह केला. कोणत्याही तांत्रिक संशोधनाच्या चांगली आणि वाईट अशा बाजू असतात.
न्यायदानाचे काम हे विज्ञान व तंत्रज्ञानामुळे सुलभ झाले असले तरी त्यातील मानवीय तार्किक क्षमतेचे महत्व नाकारून चालणार नाही, असेही ते म्हणाले. डॉ. स्वाती योगेश यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इंडियन लॉ सोसायटीच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य, आयएलएस विधी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





