पुणे – उन्हाळ्यामुळे महापालिकेच्या उद्यानांतही पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र, त्यासाठी आधीच शहरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याने ते पाणी न वापरता पेशवेकालीन पाण्याच्या उच्छवासांचा वापर करण्यात येत आहे. तळजाई टेकडीपाठोपाठ आता महापालिकेकडून ओंकारेश्वर मंदिराजवळच्या नदीपात्रातील उच्छ्ववासाचे पाणी वा. द. वर्तक उद्यानासाठी वापरण्यात येणार आहे.
वर्तक उद्यानाला पाणी पुरविण्यासाठी आवश्यक असलेली जलवाहिनी उद्यान विभागाकडून टाकण्यात आलेली असून पुढील आठवड्यापासून हे पाणी वापरण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
महापालिकेची शहरात सुमारे 200 हून अधिक उद्याने आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते. गेल्या काही वर्षांपर्यंत महापालिकेकडून त्यासाठी पिण्याचे पाणीच वापरण्यात येत होते. मात्र, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळून उद्यानांसाठी बोरवेल, नाले, शुद्ध केलेले सांडपाणी, विहिरींचे पाणी वापरण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही अधिक पाणी लागत असल्याने आता उद्यान विभागाने आपला मोर्चा नैसर्गिक पाण्याचे उच्छवास तसेच पेशवेकालीन उच्छवासांकडे वळविला आहे. नुकतेच महापालिकेने तळजाई टेकडीसाठी सहकारनगर येथील एका नैसर्गिक पाण्याच्या उच्छवासाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे आता वर्तक उद्यानासाठीही नदीकाठावर असलेला हा उच्छवास वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी वर्षभर पाणी सुरू असते. रस्त्यावर राहणारे नागरिक तसेच स्थानिकांकडून त्याचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. त्यानंतरही हे पाणी शिल्लक राहते. त्यामुळे त्याचा वापर वर्तक उद्यानासाठी करण्यात येणार असून हे पाणी मोटारीद्वारे उद्यानात टाकीपर्यंत आणले जाणार असल्याचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले. तसेच या पूर्वी अशाच प्रकारे येरवडा येथे आढळलेल्या एका नैसर्गिक उच्छवासाचे पाणी उद्यानासाठी तसेच त्या ठिकाणी टॅंकर पॉईंट उभारून दुभाजकांसाठी वापरण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.