पुणे – मे महिना संपत आला तरीही महावितरण प्रशासनाने अद्याप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाच्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्याशिवाय पदोन्नतीच्या बाबतीतही हालचाली सुरू केलेल्या नाहीत. प्रशासनाच्या या थंड धोरणामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय आणि अन्य संस्थांच्यावतीने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बदलीच्या हालचाली सुरू करण्यात येतात. त्याच धर्तीवर महावितरण प्रशासनामध्येही हीच पद्धत अवलंबण्यात येत आहे. त्यानुसार दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून त्याबाबतच्या हालचाली सुरू करण्यात येतात. तरीही या बदल्या अधिक पारदर्शीपणे व्हाव्यात यासाठी प्रशासनाच्यावतीने ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, त्यासाठी प्रशासनाने अधिक कालावधी लावल्याने ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस कृष्णा भोयर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, फेडरेशनच्या वतीने यासंदर्भात प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. तरीही प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही, त्यामुळे नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागणार आहे. त्यासाठी कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.