पुणे – ज्या नवीन रस्त्यांची गरज शहराच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकर्षाने व्यक्त करण्यात आली आहे, त्याला विरोध करण्यासाठी पर्यावरणाच्या नावाखाली राजकीय पक्ष आपल्या सोयीची भूमिका घेत रस्ता अडवित आहेत. मात्र, त्यामुळे विधी महाविद्यालय रस्ता आणि शहराच्या पूर्व भागातून पश्चिमेकडे जाणाऱ्या भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, बीएमसीसी रस्त्याच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विरोधाला विरोध न करता हा रस्ता तातडीनं मार्गी लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
बालभारती ते पौड फाटा या रस्त्याला पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली विरोध केला जात असतानाच; दैनिक प्रभातने दि. 4 मे रोजी बालभारती- पौड फाटा रस्ता का महत्वाचा? या मथळ्याखाली अतिशय सविस्तर आणि डोळे उघडणारे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर अनेक बाबी स्पष्ट झाल्याने अनेकांनी दैनिक प्रभातकडे हा रस्ता होणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, हा रस्ता करण्याची मागणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरी संस्थांकडूनही पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
पश्चिमोत्तर उपनगरांना जोडणाऱ्या आणि दक्षिणोत्तर असलेल्या लॉ कॉलेज रोडच्या दक्षिणेला कर्वे रस्ता, तर उत्तरेकडे सेनापती बापट रस्ता आहे. दक्षिणेकडील एरंडवणे, पौड रोड, कोथरूड, वारजे, इत्यादी परिसरातील नागरिक उत्तर भागातील सेनापती बापट रोड, पुणे विद्यापीठ, बाणेर, पाषाण, औंध, पीसीएमसी इत्यादी परिसरात ये-जा करण्यासाठी लॉ कॉलेज रोड वापरतात. या रस्त्यावर तीन सिग्नल असून 10 गल्ल्या आहेत. शिवाय 6 प्रमुख रस्ते भांडारकर रोड, प्रभात रोड, कर्वे रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रोड, एनएनडीटी कॅनॉल रस्त्यांकडून या रस्त्यावर वाहने येतात. पण, कागदावर हा रस्ता चार लेनचा असला तरी प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी दोन लेनच विकसित असल्याने सकाळी आणि सायंकाळी सर्व वाहने या बॉटलनेक रस्त्यावर येतात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होते.
रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुनच रस्ता ओलांडावा लागतो. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गल्ल्या असल्याने रस्त्यात दुभाजकही टाकता येत नाहीत. अशा स्थितीत लेन कटिंग करून येणाऱ्या वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडते. त्यामुळे इंधनाच्या ज्वलनामुळे वाढणाऱ्या प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणही लक्षणीय प्रमाणात वाढते आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने मनुष्यबळाच्या कामांचे तासांचे होणारे नुकसान आणि प्रदूषणामुळे होणारे आरोग्यावरील परिणाम हे पैशांतही मोजता न येणारे आहे.
राजकीय विरोध अनाकलनीय
या रस्त्याचा काही भाग हनुमान टेकडीच्या पायथ्याजवळील परिसरातून जात असल्याने पर्यावरण अभ्यासकांकडून होणाऱ्या विरोधाच्या आडून या रस्त्याला आता राजकीय विरोध होऊ लागला आहे. शहराचा वाहतूक आराखडा, रस्त्याची आखणी तसेच रस्त्याचे सर्वे तसेच इतर कामे गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असून, अनेक राजकीय पक्षांनी महापालिकेत त्याला मान्यता दिली आहे. त्यानंतर आता महापालिका निवडणुका, लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुका आल्याने या पक्षांनी आपली भूमिका अचानक बदलली आहे. आधी या रस्त्यासाठी एकत्र येऊन मान्यता देणारेच, आता रस्ता पर्यावरणास हानिकारक असल्याची आवई उठवत आहेत. मग, या रस्त्याच्या आखणीला तसेच सर्वेक्षणाला मंजुरी देताना हे पक्ष कुठे गेले होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहतूक अभ्यासकांवरच आक्षेप चुकीचा
अनेक जण अर्धवट माहितीच्या आधारावर या रस्त्याला विरोध करत, थेट वाहतूक अभ्यासकांवरच आक्षेप घेत आहेत. सर्व्हेनुसार जिथे लॉ कॉलेज रोडवरील 64 टक्के वाहतूक नवीन रस्ता वापरणार आहे; तिथे 15 टक्क्यापेक्षा कमी वाहने नवीन रस्ता वापरणार आहे, असे सांगून लोकांची दिशाभूल केली जात आहे. महापालिकेने शहाराचा एकात्मिक वाहतूक विकास आराखडा करताना पर्यावरण अभ्यासकांच्या, वाहतूक तज्ज्ञांच्या भूमिका जाणून घेतलेल्या आहेत. या आरखड्यातच या रस्त्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाने या रस्त्याची गरज व्यक्त करत तो करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, आता या रस्त्यास विरोध करून एक प्रकारे वाहतूक अभ्यासकांवर आक्षेप घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत सर्वांच्या बाजू समजून घेऊ, असे अनेकदा महापालिका स्पष्ट करत असताना; तसेच सुमारे दोन किलोमीटरच्या या रस्त्यासाठी टेकडीचा 0.5 टक्केपेक्षाही कमी भाग जाणार असताना वाहतूक तज्ज्ञांवरच आक्षेप घेऊन या रस्त्याला विनाकरणच विरोध केला जात आहे. या उलट या रस्त्यासोबतच हनुमान टेकडी, वेताळ टेकडी व पुण्यातील इतर टेकड्याच्या संवर्धनासाठी महापालिका आणि नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनाच्या नव्या पर्यायांवर चर्चा करता येणे शक्य आहे.