पुणे – प्रतिकूल वातावरणीय स्थितीमुळे देशातील मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. पोषक वातावरण नसल्याने मान्सूनच्या वाटचालीचा वेग मंदावला आहे. याच दरम्यान पुण्यातही पावसाने दडी मारली असून, पुढील दोन दिवस वातावरणाची हीच स्थिती कायम असणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात मान्सूनने प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, बाराबंकी, बरेली, सहारनपूर, अंबाला आणि अमृतसर हा भाग व्यापला आहे.
मात्र, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीचा उर्वरित भागात मान्सूनच्या पुढे सरकण्यासाठी वातावरणीय परिस्थिती पुरेशी अनुकूल नाही. तसेच सध्या पूर्व उत्तरप्रदेशातील असलेल्या चक्रीय स्थितीमुळे पुढील पाच दिवस मान्सूनचा प्रवास संथ गतीने होईल.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी (दि.16) रत्नागिरी येथे सर्वाधिक म्हणजेच 52 मिमी, तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे सर्वाधिक 45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली.