पुणे –शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते तसेच नदीत सोडून दिल्याने जलप्रदूषणात वाढ होत आहे. याप्रकरणी कारवाई करत, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले होते. मात्र, अद्यापही या समस्येवर योग्य उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे “एमपीसीबी’ने पुन्हा एकदा महापालिकेवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
शहर परिसरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी 45 टक्के पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने नदीतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी, यासाठी “एमपीसीबी’कडून मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. मात्र, महापालिकेने नियोजित वेळेत काम पूर्ण न केल्याने मंडळाने कारवाईची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. शहरातील सांडपाणी निर्मिती, प्रक्रिया, उपाययोजना यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश मंडळाने महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर याबाबतचे विश्लेषण करून महापालिकेला दंड आकारला जाईल, अशी माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी 2019 मध्येदेखील महापालिकेला अशा कारवाईला सामोरे जावे लागले. होते. मंडळाने महापालिकेचा तब्बल 15 कोटींचा निधी गोठवला होता. मात्र, सांडपाणी प्रक्रियेबाबत अद्यापही समाधानकारक कामगिरी न झाल्याने महापालिकेला पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.