Pune : वेग आवरा नाहीतर दंड भरा

पुणे : महामार्गावर वेगात वाहने चालवताना ताबा सुटून होणाऱ्या अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी वेगावर नियंत्रण रहावे आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओने) विना सीट बेल्ट आणि महामार्गावरील वेगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवली आहे. परिणामी गेल्या वर्षात साडेतेरा हजार वाहनांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची कारवाई केली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात सर्वाधिक अपघात होत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. महामार्गावर होणारे अपघातामध्ये वेग हे मुख्य कारण असल्याचे दिसून येत. तसेच, अनेक अपघातांमध्ये वाहन चालक आणि इतर व्यक्तीने सीट बेल्ट न लावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
परिवहन विभागाकडून प्रत्येक वेळी वेग मर्यादा आणि सीट बेल्टच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाते. तरीही अनेक वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे आरटीओने वेगमर्यादा, सीट बेल्ट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे.
कारवाईला वेग
पुणे आरटीओच्या हद्दीतून कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर हे महत्वाचे महामार्ग जातात. या मार्गावर वायुवेग पथक स्पीडगनच्या मदतीने वेगाचे उल्लंघन आणि वीना सिट बेल्ट असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. २०२३-३४ मध्ये फक्त ३७० वाहनांवर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याची कारवाई झाली होती. त्यात २००२४-२५ मध्ये मोठी वाढ झाली असून यावर्षी १३ हजार ८१७ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली.
मोबाईलवर बोलणारे वाढले
वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढत असल्याचे कारवाईवरून दिसून येते. चारचाकी मोटार चालविताना कानाला मोबाईल लावून बोलणाऱ्यांवर आरटीओकडून नजर ठेवली जाते. तसेच, अनेक ट्रक, बसचालकही गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसते. गेल्या दोन वर्षात अशा पाच हजार जणांवर कारवाई केली आहे.
वाहन चालकांनी वाहने चालविताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीट बेल्ट लावणे आवश्यक असून त्याचे काटेकोर पालन करावे.
स्वप्निल भोसले – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





