पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील पालख्या एसटीनेच जाणार आहेत. यासाठी प्रशासनाने “शिवशाही’च्या 8 बसेसचे नियोजन केले आहे, असे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.
दरवर्षी विठुनामाच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराज यांची श्री क्षेत्र देहू आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी सोहळ्याला सुरुवात होते. “याचि देही, याचि डोळा’ हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र मागील वर्षी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वारी पालखी सोहळ्याचे विश्वस्त आणि मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली होती.
यासाठी सर्व प्रमुख पालख्यांच्या पादुका रा.प. महामंडळाच्या बसने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. यंदा देखील करोनाचे सावट कायम असून, करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी देखील एसटीनेच 19 जुलै रोजी या पालख्यांचे पंढरपुरकडे प्रस्थान होणार आहे. मात्र, यावेळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या गतवर्षीपेक्षा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बससंख्या वाढवली आहे.
मागील वर्षी एसटीच्या “विठाई’ बसेसने पालख्या पंढरपूरला रवाना झाल्या होत्या. यंदाही करोनाचा प्रादुर्भाव आणि निर्बंध कायम आहेत. त्यामुळे पालख्या एसटीनेच मार्गस्थ होणार आहेत. मात्र याबाबतचे नियोजन अद्याप महामंडळाने स्पष्ट केलेले नाही.