जिल्हा प्रशासनाचा बैठक घेण्यास नकार : योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा पाडले बंद
पुणे – भामा आसखेड योजनेबाबत निर्माण झालेला तिढा आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच सुटणार आहे. गेल्या महिन्याभरापासून या योजनेचे काम प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा बंद पाडल्याने याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने बैठक घेण्याची मागणी महापालिकेने केली होती. मात्र, पालिकेस थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या धरणातून शहराच्या पूर्व भागाच्या पाणी पुरवठ्यासाठी राबविण्यात येणारी सुमारे 374 कोटींची भामा आसखेड योजना चांगलीच अडचणीत सापडली आहे. या योजनेचे 85 टक्के काम पूर्ण झाले असल्याने महापालिकेने जून-2019 पर्यंत ती कार्यान्वीत करण्याचे नियोजन केले होते. मात्र, 7 मार्चपासून हे काम पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले आहे. परिणामी, या योजनेचे काम पाहणाऱ्या ठेकेदारानेही हे काम सोडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, महापालिकेकडूनही जून-2019 मध्ये हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, आता महिन्याभरापासून पुन्हा काम बंद झाल्याने ही डेडलाईन हुकणार असून अनिश्चित काळासाठी काम बंद झाले आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकीसाठी तीन महिने जाणार असल्याने पालिकेने तातडीची बाब म्हणून याप्रकरणी तिढा सोडविण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली होती. मात्र, आचारसंहितेचे कारण देत, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतरच याबाबत बैठक घेतली जाईल, असे पालिकेस स्पष्ट करण्यात आले आहे.