पुणे – दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांनी ठाणे येथे व्यापाऱ्याला कारवाईची भीती दाखवत 45 लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली-ठाणे पोलिसांनी एका खासगी व्यक्तीला अटक केल्यानंतर तीन पोलिसांची नावे समोर आली आहेत. हे तिघेही फरार होते. त्यांना मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
संबंधित व्यापाऱ्याबाबत पुण्यातील पोलिसांना टीप देणारा बाबुभाई सोलंकी (47 , रा. बालाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, गणेश शिंदे (35), गणेश कांबळे (34 ) आणि दिलीप पिलाने (32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद येथील व्यक्तीने तक्रार दिली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गाव येथील एका पेट्रोल पंपाजवळ 8 मार्च रोजी हा प्रकार घडला.
तक्रारदारांचा स्टीलचा व्यवसाय आहे. आरोपी सोलंकी हा त्यांचा नातेवाईक आहे. त्याचा आणि आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांचा परिचय आहे. त्यातूनच हा व्यापारी मोठी रोकड घेऊन भिवंडी येथून जाणार असल्याची माहिती सोलंकीने तिघांना दिली.
त्यानंतर चौघांनी मिळून रोकड लुटण्याची योजना आखली. व्यापाऱ्याची गाडी दिसताच तिघा पोलिसांनी त्यांना अडवून बाजूला घेतले.
त्यानंतर “आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीत मोठी रोकड आहे. तपास करायचा आहे,’ अशी बतावणी करून पाच कोटी रुपयांच्या रोकडमधून 45 लाख रुपये काढून घेतले आणि तेथून पळ काढला.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी माहिती काढली. त्यावेळी सोलंकी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता, इतरांची नावे समोर आली. तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात येऊन चौकशी केली.
त्या वेळी तिघे फरार असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी प्रत्येकी नऊ लाख रुपये वाटून घेतले असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान त्यांना शनिवारी अटक करण्यात आली.