पुणेकरांनो लक्ष द्या…! नदीतील विसर्गाच्या २ तास आधी वाजणार भोंगा; यंत्रणा सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Pune News : महाराष्ट्रात मान्सनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्राला तर पावसाने अक्षरक्षाः झोडपून काढलं आहे. पुणे शहरात देखील दमदार पाऊस कोसळत आहे. मान्सून राज्यात वेळेआधीच दाखल झाला असून येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे पावसाच्या नियोजनाला सुरूवात करण्यात आली असून, धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गाआधी नागरिकांना २ तास अगोदर सूचना मिळणार आहेत. विसर्ग करताना इशारा यंत्राच्या स्वरुपात भोंगा वाजवला जाणार आहे. पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी ही यंत्रणा सुरू ठेवावी, त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना द्यावी, अशी सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
यंदा मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या पाण्यामुळे येथील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेक वाहने पाण्यात वाहून गेली होती. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. यंदाचा पावसाळा अधिक असल्याने आता प्रशासन अलर्ट मोडवरून आले आहे. तशा सचूना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
सतर्क राहण्याचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्यात तीन बळी घेतले आहेत. कर्वेनगर भागामध्ये झाड कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसात पुण्यात आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले असून, पुणे शहराला आज २७ मे रोजी अॅारेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.





