प्रभात वृत्तसेवा पुणे – तळेगाव दाभाडे ते उरुळीकांचन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाची आखणी करण्यात येत असून त्या प्रकल्पाला होणारा विरोध पाहता, त्या प्रकल्पाबाबत ७ नोव्हेंबरला रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत रेल्वे मार्ग बदलता येईल का, याची तपासणी केली जाईल. मार्ग बदलता कसा येईल. याबाबत प्रयत्न करू तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत डुडी बोलत होते. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे तसेच रेल्वे बोर्डाचे अधिकारी आदींसह खेड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.यावेळी आमदार बाबाजी काळे म्हणाले की, प्रत्येक गावामधील काही नागरिकांची संयुक्त समिती स्थापन करावी. या भागात अनेकांनी घरे बांधली आहेत. गोदाम उभारले आहेत. अनेक भागातील राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), रिंगरोड तसेच अन्य प्रकल्पा्ंसाठी जमीन गेल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आम्ही हा विषय मांडला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सूचना केल्याने ही बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, खेड तालुक्यात विविध सहा सात प्रकल्प उभारले जात आहेत. त्या प्रकल्पांसाठी यापूर्वीच शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. या तालुक्यातून जाणारा रिंगरोड साकारला जात असला तरी त्याचा थेट आम्हाला फायदा होत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारले जाणारे लॉजिस्टिक पार्कसाठी अदानी, अंबानी यांच्यासह मोठ्या कंपन्यांना जमिनी देण्यात आल्या आहेत. त्याच भागातून जाणरा पुणे नाशिक रेल्वे मार्गाला हा प्रकल्प जोडला जावा. या रेल्वे प्रकल्पामुळे १४ गावे उध्वस्त होणार आहेत.