पुणे – गणेशोत्सवाच्या कालावधीत उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी वाहतूकदारांनी मनमानी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गणेशोत्सव तसेच त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या कालावधीत खासगी वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामाचा गैरफायदा घेत मनमानी भाडे वसूली केली जाते. त्यामुळे या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या कालावधीत खासगी प्रवासी ज्या ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खासगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खासगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे आदेशही डॉ. ढाकणे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या-त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने दि.27/7/2008 मध्ये शासन निर्णय जारी करुन निश्चित केले आहेत. त्यानंतर, या गर्दीच्या हंगामाच्या कालावधीत प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली जाते. त्यानंतर प्रवासी तक्रार करतात.
मात्र, वेळ निघून गेल्याने संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे यंदाच्या वर्षी आधीच याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच, खासगी वाहने सूटण्याच्या ठिकाणासह, प्रवाशांना येणाऱ्या अडचणींच्या तक्रारी करण्यासाठी सर्व आरटीओंनी तातडीनं कार्यवाही करण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा…
गणेशोत्सवात अनेक जणांना आयत्या वेळी खासगी वाहनाद्वारे जागा मिळविताना तिकिटांचे मनमानी शुल्क मोजावे लागते. त्यावेळी कोठेही तक्रार करता येत नाही. तसेच शासनाने निश्चित केलेले दरही माहित नसतात, त्यामुळे आता या दरांचे फलक खासगी बस थांब्यांच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. मात्र, त्या सोबतच प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांकही सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.