पुणे -शहरातील बाईक टॅक्सी बंद करावी, या मागणीसाठी बंदची हाक देत शहरातील तब्बल 28 वेगवेगळ्या रिक्षा संघटनांनी सोमवारी बंद पुकारला होता. या रिक्षा बंदच्या काळात पुणेकरांनी पीएमपीद्वारे प्रवासाला पसंती दिली. त्यातून पीएमपीला तब्बल 2 कोटी 4 लाख 78 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या दिवशी पीएमपी प्रवाशांच्या संख्येने 15 लाख 47 हजारांचा टप्पा गाठला आहे. दोन आठवड्यापूर्वीही पीएमपीने दोन कोटींचा टप्पा केला होता. तर त्यापूर्वी 2016 मध्ये पीएमपीला एकाच दिवशी एवढे उत्पन्न मिळाले होते. रिक्षाचालक एका बाजूला आपला आक्रोश व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र पीएमपीची दिवाळी झाली आहे.
रिक्षा संघटनांनाकडून शहरात बंद पुकारण्यात आला होता. ही बाब लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने शहरात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दैनंदिन संचलनाव्यक्तिरिक्त 100 जादा बसचे नियोजन केले होते. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील 11 मार्गांवर बंद केलेल्या बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे सोमवारी पीएमपीच्या सुमारे 1740 बस रस्त्यावर होत्या. त्यातून जवळपास 15 लाख 47 हजार प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यात तिकिट विक्रीमधून 1 कोटी 92 लाख 8 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे, तर पास विक्रीतून 12 लाख 62 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पीएमपीच्या इतिहासात तिकिट विक्रीतून पहिल्यांदाच एवढे उत्पन्न मिळाले आहे.
प्रवासीकेंद्रीत सेवा
रिक्षाचा संप लक्षात घेऊन पीएमपीकडून ज्या वर्दळीच्या रस्त्यांवर रिक्षांची संख्या जास्त असते, त्या रस्त्यांवर वाढीव गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी संध्याकाळी या गाड्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या. त्यामुळे रिक्षाचा वापर करणाऱ्या अनेकांना पीएमपीची सेवा मिळाल्याने त्यांच्याकडूनही पीएमपीला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे तब्बल सहा वर्षांनंतर पीएमपीने एकाच महिन्यात दोन वेळा दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर यापूर्वी केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच पीएमपीचे उत्पन्न वाढत होते. मात्र, संप लक्षात घेऊन प्रवासीकेंद्रीत सेवा दिल्याने पीएमपीच्या उत्पन्नात चांगली वाढ होत असल्याचे चित्र आहे.