पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अखेरची संधी देण्यात आली असून आता 28 ते 30 डिसेंबर दरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन समुपदेशनाद्वारे ही प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार तीन फेऱ्या घेण्यात आल्या. या अंतर्गत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून त्यांचे नियमित वर्गही सुरू झाले आहेत. मात्र मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती उपसंचालकांनी सादर केलेल्या यादीनुसार 270 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्याची विनंती केली आहे.
करोना परिस्थितीमुळे अनिश्चितता, माहिती वेळेत न मिळणे, पालकांचे स्थलांतर आदी कारणांमुळे प्रवेश मिळण्यास विलंब झाल्याची कारणे दर्शवण्यात आली आहेत. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देण्यासाठी अखेरची प्रवेश फेरी राब्वण्यात येणार आहे. त्यासाठी उपसंचालक स्तरावरून रिक्त जागांचा तपशील विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्या सोयीचे महाविद्यालय प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.