प्रभात वृत्तसेवा पुणे – सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मात्र, मानवी बुद्धिमत्ता महत्त्वाची असून, उद्याचे जग हे एआयच्या तंत्रावर नव्हे, तर ज्ञानोबा- तुकोबांच्या मंत्रावर चालेल, असे विचार ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर- तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी एमकेसीएलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विवेक सावंत, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते. या वेळी विश्वशांतीच्या जीवन कार्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. योगगुरू अनंत कोंडे व मारुती पाडेकर गुरुजी यांचाही सत्कार करण्यात आला. विश्वास पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. महाराजांनी शक्ती, युक्ती आणि भक्तीच्या संगमातून स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्यातून मानवी जातीचे कल्याण केले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ राजे झाले.डॉ. विवेक सावंत म्हणाले, की विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामधील अद्वैत कल्पना ही आपली संतपरंपरा आहे. ती पुढे नेण्याचे काम डॉ. कराड यांनी केले. आज बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेची गरज असून, त्यातूनच भारत आत्मनिर्भर होईल.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, की भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्त्वपूर्ण आहेत. ज्ञानोबा- तुकोबा हा टाळकुट्यांचा विषय नाही, हे एक चांगले जीवन जगण्याचे सार आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी संतांचाच एकमेव मार्ग आहे.