प्रभात वृत्तसेवा पुणे – सामाजिक कामे संवेदनशीलतेने केले पाहिजे,असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शिवाजीनगरमधील मॉडर्न कॉलेजतर्फे संकटातून संकल्पाकडे हा कार्यक्रम झाला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. जोत्स्ना एकबोटे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याच्या आवाहनाला राज्यातील संस्था, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रतिसाद देत मदत कार्य राबवले. यासाठी राज्यातील २० महाविद्यालयांची मोलाची मदत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याच महाविद्यालयांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षक भरती आणि संशोधन निधी उपलब्ध होईल का याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. गजानन एकबोटे व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले. आभार डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांनी मानले.