Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारात अवेळी आलेल्या पावसामुळे शेकडो उत्तरपत्रिका भिजल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या सर्व उत्तरपत्रिकांचा निकाल आधीच जाहीर झालेला असून, त्यांची मूल्यमापन व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानेच त्या निकाली काढल्या जात असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार (Pune News) आणि अध्यादेशातील तरतुदींनुसार, कोणत्याही सत्राचा निकाल लागल्यानंतर आणि त्यासंदर्भातील फेरतपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ठराविक कालावधीने उत्तरपत्रिका नष्ट करण्याची प्रक्रिया राबवली जाते. अधिकार मंडळाच्या मान्यतेने सध्या ही प्रक्रिया सुरू असून, संबंधिताना या उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विल्हेवाटीसाठी या उत्तरपत्रिका संकलित करून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पावसामुळे उघड्यावर असलेल्या या संचांपैकी काही उत्तरपत्रिका भिजल्या. उत्तरपत्रिका रस्त्यावर किंवा उघड्यावर भिजलेल्या पाहून अनेकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत शंका उपस्थित केली होती. मात्र, या सर्व उत्तरपत्रिका ‘रद्दी’ किंवा ‘निकाली काढण्याच्या’ प्रक्रियेतील असल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन (Pune News) मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले की, या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आणि पुनर्मूल्यांकन यांसारख्या सर्व आवश्यक प्रक्रिया आधीच पूर्ण झालेल्या आहेत. नियमानुसार त्या निकाली (निरस्त) काढण्यासाठी संकलित करण्यात आल्या होत्या. ही केवळ प्रक्रियात्मक विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू असताना पावसामुळे त्या भिजल्या आहेत.