प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराच्या दक्षिण भागातील जांभूळवाडी तलावातील पाणी आता पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या तलावात येणाऱ्या सांडपाण्याला अटकाव केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून येथे ४ एलएमएलडी क्षमतेचा जलशुद्धिकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, त्याचा आराखडा महापालिकेच्या पूर्णगणक समितीच्या बैठकीत ठेवला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याचा महापालिकेचा हा पहिलाच जलशुद्धिकरण प्रकल्प असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कात्रज परिसरात महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या जांभूळवाडी गावाच्या हद्दीत हा तलाव आहे. या तलावातील पाण्याची साठवण क्षमता सुमारे अर्धा ते पाव टीएमसी आहे. तलावात जिवंत पाण्याचे झरे असून, यामध्ये आसपासच्या टेकड्यांमधूनही पाणी येते. मात्र, मागील काही वर्षांत तलाव परिसरात झालेल्या नागरिकरणानंतर अनेक सोसायट्या व इमारतींचे सांडपाणी थेट तलावात सोडल्याने तलावाचे पाणी प्रदूषित होत होते. त्यामुळे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून या भागात सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या असून, तलावात येणारे सांडपाणी बंद करण्यात आले आहे.आता प्रशासनाकडून तलावातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला असून, दिवसाला ४ एमएलडी पाणी शुद्ध करून परिसरातील सोसायट्यांना पिण्यासाठी दिले जाणार आहे. तलावाचे पाणी जड (हार्ड) असल्याने अत्याधुनिक शुद्धिकरण यंत्रणा वापरण्यात येणार असून, त्यामुळे प्रकल्पाचा खर्च अधिक असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.