प्रभात वृत्तसेवा पुणे – कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही योग्य नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल, पोलीस सह आयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, पीएमपीएल, आरोग्य विभाग, पंचायत राज संस्था आणि अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, विजयस्तंभ परिसरातील कामांना प्राथमिकता देत विजयस्तंभाची दुरुस्ती, परिसरात फुलांची सजावट, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन, छोटी वाहने व दोनचाकींसाठी स्वतंत्र जागा, आवश्यक असल्यास तात्पुरत्या पार्किंगची वाढीव व्यवस्था, वाहतूक वळविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश यावेळी दिले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव पोलीस दलाची मदत, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा, आपत्कालीन पथके, फायर ब्रिगेड, तसेच जनसमुदायावर ड्रोनद्वारे देखरेख या बाबींसाठी संबंधित विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.