राजगुरूनगर -रेल्वे बोर्डाने अंतिम मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकार मंजुरीसह सुमारे 3208 कोटी रुपये निधीचा वाटा उचलून प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
पंधरा वर्षांपासून अविरत पाठपुरावा करून मनाशी बाळगलेले पुणे-नाशिक रेल्वेचे स्वप्नं लवकरच सत्यात उतरणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले, पुणे-नाशिक रेल्वेच्या डीपीआरला रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी देण्यात येत असल्याबाबत गेल्या आठवड्याभरापूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्याकडून समजले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून प्रकल्पासाठी केंद्राप्रमाणे 20 टक्के निधीचा वाटा उचलावा, अशी राज्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांनी प्रकल्पात राज्य शासनाने मंजुरी देण्याबरोबरच निधीचा वाटा उचलण्याची तयारी दर्शविली. प्रकल्पामध्ये भूसंपादन कामात काही अडथळे येतील का, याबाबतची माहिती घेतली.
रेल्वेसाठी कमी जागेची आवश्यकता असल्याने भूसंपादनात अडचणी उद्भवणार नाही, राज्य सरकारने ही रक्कम एकाचवेळी खर्च न करता कामाच्या प्रगतीनुसार पाच वर्षात टप्प्याटप्प्याने द्यावी लागणार असल्याने सरकारवर मोठा आर्थिक भार पडणार नाही, याकडेही मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.
2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात सुरेश प्रभू यांनी रु. 2425 कोटींच्या पुणे-नाशिक रेल्वेला सर्वप्रथम मंजूरी दिली. यासाठी 40 कोटींची प्राथमिक निधीची तरतूद करून घेतली. जुलै 2018 मध्ये महारेलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजेशकुमार जैस्वाल, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून समस्या सोडविण्याचे काम केले.
पुणे-नाशिक रेल्वेसाठी माझी 15 वर्षांपासूनची तपश्चर्या आहे. वास्तविक यासारखे मोठे प्रकल्प उभे राहण्यासाठी 20-25 वर्षांचा कालावधीही कमी पडू शकतो. पूर्ण एक पिढी नष्ट होते. त्यामुळे सहा महिने, वर्षभरात तोंडदेखला पाठपुरावा करुन कुणी असे प्रकल्प मंजूर करून आणू शकत नाही, हे इथल्या सुज्ञ जनतेला चांगले ठाऊक आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी राज्याच्या आर्थिक हिस्स्यासह सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले असून प्रकल्प लवकरात लवकर सुरू होऊन या भागातील जनतेचा आर्थिक विकास व्हावा यादृष्टीने पुढील पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार