Pune District : पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
Pune District : जुन्या प्रस्तावित मार्गानेच रेल्वे नेण्यात यावी, यासाठी या भागात जनआंदोलन सुरू असल्याचे डॉ. कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीच्या अहवालावर या प्रकरणातील अनेक बाबी अवलंबून असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नारायणगाव : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, संगमनेर व सिन्नर या जुन्या प्रस्तावित मार्गानेच करण्यात यावी, तसेच मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारावा आणि चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत रेल्वे टर्मिनल उभारण्यात यावे, अशा विविध मागण्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या. याबाबत त्यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (दि. 10) भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गाबाबत सुरू असलेल्या जनआंदोलनाची माहिती दिली.
अहिल्यानगरमार्गे पुणे-नाशिक रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आल्याने चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर व सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. जुन्या प्रस्तावित मार्गानेच रेल्वे नेण्यात यावी, यासाठी या भागात जनआंदोलन सुरू असल्याचे डॉ. कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीच्या अहवालावर या प्रकरणातील अनेक बाबी अवलंबून असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत रेल्वे टर्मिनल उभारण्यात यावे, अशी मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली. या ठिकाणी रेल्वे टर्मिनल उभारल्यास औद्योगिक वाहतूक व दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम होऊन चाकणसह परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.
मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाची मागणी
न्हावाशेवा बंदराला जोडणारा उरण-तळेगाव-चाकण-संभाजीनगर असा मालवाहतुकीसाठी समर्पित स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली. हा मार्ग झाल्यास तळेगाव, चाकण, रांजणगाव, संभाजीनगर यांसह विविध औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना कच्चा माल तसेच उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी स्वस्त, जलद आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.सध्या मोठ्या प्रमाणात मालवाहतूक रस्ते मार्गाने होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असून उद्योगांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे मार्गाची आवश्यकता असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
सकारात्मक विचाराचे आश्वासन
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. तसेच डॉ. अनिल काकोडकर समितीचा अहवाल सकारात्मक यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





