Pune Nashik Highway Black Spots – पुणे-नाशिक तसेच कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिसांनी आता थेट रस्त्यावर उतरून ‘झिरो फेटल अॅक्सिडेंट’ मोहिमेला सुरुवात केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाट्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दोन्ही महामार्गांवरील धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. महामार्गांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक ठिकाणी गंभीर आणि जीवघेणे अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभाग, आरटीओ अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्या संयुक्त बैठका घेऊन धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यात आले आहेत. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील पेमदरा ते राजुरी दरम्यानचे चार पॉईंट्स आणि पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाका परिसर, लंबोदर हॉटेलसमोरील वळण, फाउंटन हॉटेलजवळील धोकादायक भाग व पिंपळवंडी फाटा या चार ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आळेफाटा पोलीस हद्दीतील गेल्या काही वर्षांतील अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. २०२४ मध्ये तब्बल ३२ जणांचा अपघातात मृत्यू झाला, २०२५ मध्ये २० प्राणघातक अपघातांची नोंद झाली, तर २०२६ मध्ये गुंजाळवाडी येथील भीषण एसटी बस अपघातासह आतापर्यंत सहा गंभीर अपघात घडले आहेत. ही वाढती मृत्यूची मालिका थांबवण्यासाठी पोलिसांनी आता थेट कृती आराखडा तयार केला आहे. आळेफाटा (ता. जुन्नर) : पुणे-नाशिक आणि कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अधिकाऱ्यांना सूचना देताना पोलीस निरीक्षक विश्वास जाधव. सात दिवसांत उपाययोजना करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी संबंधित कंत्राटदारांना पुढील सात दिवसांत सर्व धोकादायक ठिकाणी रबलर स्ट्रिप्स, वेगरोधक पट्टे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या भागात काँक्रिटीकरण अपूर्ण आहे, त्या ठिकाणी रात्री वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज यावा यासाठी तातडीने रिफ्लेक्टर्स बसवले जाणार आहेत. याशिवाय महिनाअखेर पर्यंत रस्त्यांची डागडुजी, क्युरिंग आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले असून सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “आळेफाटा पोलीस हद्दीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ‘झिरो डेथ कॉरिडॉर’ हेच आमचे लक्ष्य आहे.” – विश्वास जाधव, पोलीस निरीक्षक, आळेफाटा