सिंहगडरस्ता, दि. 5 (प्रतिनिधी) -महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नांदेड, किरकिटवाडी, नांदोशी या गावांना अद्यापही ग्रामपंचायतीच्या जुन्या यंत्रणेद्वारेच अनेक वर्षांपासून विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे. खडकवासला धरणातून थेट पाणी नांदेड गावातील खासगी विहिरीमध्ये येते तेथून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर मिसळून ते संबंधित गावांना पुरवले जाते.
नांदेडचे युवा नेते अविनाश लगड यांनी या तीनही समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र करण्याच्या मागणीचे पत्र आयुक्तांना दिले आहे. याबाबत लगड यांनी सांगितले की, जल विभागातर्फे अशास्त्रीय पद्धतीने पाणी शुद्ध केले जाते. ब्लिचिंग पावडरचे प्रमाण किती पाहिजे?पाण्याची गुणवत्ता? पाण्याची तपासणी या संदर्भात कोणतेही रिपोर्ट मागितले तर मिळत नाही. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याचीच शंका येते. पिण्याचे पाणी हे आरोग्यास योग्य आहे की नाही यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही.
प्रशासन या बाबतीत पूर्णपणे दूर्लक्ष करीत आहे. या तीन गावांतील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला कोणतीही संरक्षक जाळी बसविलेली नाही. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच वेळा नागरिकांचे आरोग्य पाण्यामुळे धोक्यात आलेले आहे. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे साथीचे आजार, कावीळ, मुतखडा असे अनेक विकार या दूषित पाण्यामुळे या भागातील नागरिकांना होत आहे. शुद्ध पाणी देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. गावे समाविष्ट होऊन वर्ष लोटले तरीही प्रशासन अजून जलशुद्धीकरण केंद्र करण्यासाठी धोरणात्मक निर्णय का घेत नाही? हा आमचा प्रश्न आहे किती दिवस नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळणार? असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.
समाविष्ट गावांच्या जलशुद्धीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, तशी नागरिकांची मागणी आहे. आम्ही प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करीत आहोत. नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
– संजय देशमुख, कार्यकारी अभियंता, जलशुद्धीकरण
विभाग, मनपा