Pune Mumbai Expressway Accident – पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी दोन तासांच्या अंतरात झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील खोपोली मिसिंग लिंक परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे अपघात घडले. सलग घडलेल्या दुर्घटनांमुळे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घाट परिसरात चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात सायंकाळच्या सुमारास घडला. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका खासगी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताचा जोर इतका होता की काही वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहने बाजूला करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असतानाच त्याच परिसरात दुसरी भीषण दुर्घटना घडली. पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात. या अपघातामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. दुसऱ्या अपघातात तीन ट्रक एकमेकांना धडकले. घाटातील तीव्र उतारावरून वेगाने येणाऱ्या एका ट्रकने समोरून जात असलेल्या दोन ट्रकना जोरदार धडक दिली. हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. धडकेमुळे मधल्या ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात ट्रकमध्ये असलेले रंगसदृश्य केमिकल महामार्गावर मोठ्या प्रमाणात सांडले. तसेच ट्रकमधील रंगाचे डबे आणि अन्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटविण्याचे काम सुरू होते. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनची टीम तसेच आयआरबीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रात्री उशिरा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. महामार्गावर सांडलेले केमिकल आणि विखुरलेले साहित्य हटविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, द्रुतगतीमार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, सुरक्षित अंतर राखावे आणि घाट परिसरात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः उताराच्या भागात अवजड वाहनांच्या वेगामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.