अतुल गाडगीळ : “बिल्डींग कंडीशन सर्व्हे’मुळे परिणाम
पुणे – महात्मा फुले कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा मेट्रो टप्पा भुयारी असून काही गोष्टींमुळे येथील कामाला वेळ लागणार असल्याचे, “महामेट्रो’चे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
महात्मा फुले कृषी विद्यालयामध्ये भुयारी मेट्रोचे काम आधीच सुरू झाले आहे. तेथे “शाफ्ट’ बनवण्याचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, भुयारी मेट्रोचे काम सुरू करण्याआधी ज्या चाचण्या कराव्या लागतात त्यातील “बिल्डींग कंडीशन सर्व्हे’ हे काम अत्यंत वेळ खाऊ आहे. तसेच, काही नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याने अडचण होत असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.
टोपोग्राफीकल सर्व्हे, बिल्डींग कंडीशन सर्व्हे आणि जीऑलॉजिकल सर्व्हे या तीन गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत. या मार्गावरील टोपोग्राफीकल सर्व्हे पूर्ण झाला आहे. परंतु, जीऑलॉजिकल सर्व्हेमध्ये केवळ कसबा पेठेतील मेट्रोच्या दोन्ही बाजूचा मिळून चारशे मीटरचा सर्व्हे नागरिकांनी प्रतिसाद न दिल्याने अद्याप होऊ शकला नाही. त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
बिल्डींग कंडीशन सर्व्हे हा भुयारी मेट्रोचे काम सुरू करण्यापूर्वी करण्याचा महत्त्वाचा सर्व्हे आहे. यामध्ये मेट्रो ज्या पाच किमी मार्गावरून जाणार आहे त्या मार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी पन्नास मीटर असा शंभर मीटर अंतरादरम्यान असलेल्या सदनिकांचा सर्व्हे करावा लागणार आहे.
या सर्व्हेमध्ये प्रत्येक घरात जाऊन, भिंतींचे मॅपींग करावे लागते, तसेच त्याचे व्हिडीओ आणि नोटसही काढावे लागतात. कृषी महाविद्यालय ते कसबा पेठपर्यंत सुमारे 556 इमारती आहेत. यापैकी 358 इमारतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. अन्य 198 इमारती या कसबापेठ भागात येतात आणि तेथील नागरिक या कामासाठी सहकार्य करत नसल्याने ते काम पूर्ण होऊ शकले नाही.
137 इमारतींच्या सर्व्हेचे काम पूर्ण
कसबा पेठ ते स्वारगेट या अंतरादरम्यान 1004 इमारती आहेत. त्यातील 137 इमारतींच्या सर्व्हेचे काम पूर्ण झाले असून 867 इमारती अद्याप शिल्लक आहेत. या इमारतींमध्ये वाडे, छोटी, मोठी घरे यांचाही समावेश आहे. हा सर्व्हे झाल्यानंतर यातील धोकादायक इमारती, मॉडरेट असलेल्या किंवा पूर्णपणे संरक्षित असलेल्या इमारतींचा अहवाल तयार करण्यात येईल. वास्तविक हे काम सुरू असताना या इमारतींना कोणताही धोका होणार नाही. कारण हे काम जमिनीखाली 20 मीटर सुरू असणार आहे. तरीही कोणीही याला विरोध करू शकतो. त्यामुळे आधीच ही काळजी घेण्यात आली आहे. ज्या घरांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यांची स्वाक्षरीही आणि सहमतीही घेण्यात येणार आहे. धोकादायक वाटणाऱ्या इमारतींच्या खालून काम सुरू झाले की त्यांना तात्पुरत्या स्वरुपात “महामेट्रो’च्या खर्चाने स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.