पुणे – खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजेदरम्यान दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर अतिक्रमण तसेच सेवा वाहिन्या सात दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे. अतिक्रमणे सात दिवसांत नाही काढली तर प्राधिकरणाकडून त्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईचा खर्च व दंड संबधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
मिळकतधारकांनी अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास दी कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अँड ट्राफिक) ऍक्ट 2002 अन्वये पाडण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्यावतीने ही अतिक्रमणे काढताना, सेवा रस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान, असुविधा झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पुणे येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी स्पष्ट केले आहे.