हडपसर (विवेकानंद काटमोरे) – परिसरातील मुख्य रस्त्यांवर खासगी ट्रॅव्हल्स बसचालक अनधिकृत थांबे घेत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीस निमंत्रण मिळत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी अनेक वेळा दोन ट्रॅव्हल बसमध्ये अडकून अपघातही झाले आहेत. रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या खासगी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या एक तृतीयांश भागापर्यंत उभ्या राहत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर सोसायटी धारकांना घरी ये-जा करताना वादाला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी येथे असतानाही तासन्तास या खासगी ट्रॅव्हल बसेस वाहतुकीस अडथळा करून उभ्या असतात. तर, आमदार चेतन तुपे यांनी याच विषयाकडे विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधले. हडपसर येथील पुणे- सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा आहे. याशिवाय वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यात खासगी ट्रॅव्हल बसेस रस्त्यावर उभ्या राहत आहेत. या बसेसला दुसरीकडे थांबे देण्यात यावेत, या बसेसवर नियमित कारवाई करण्यात यावी, हे अनधिकृत थांबे वर्दळीच्या हद्दीबाहेर न्यावेत, वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घेऊन तेथूनच या बसेस सोडण्यात याव्यात अशा अनेक उपाययोजनांवर पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व तज्ज्ञांच्या उपस्थितीत वारंवार चर्चा व बैठका घेतल्या गेल्या. मात्र, यानंतर अवघ्या आठवड्यात पुन्हा या खासगी ट्रॅव्हल्स मुख्य रस्त्यावर थांबतच आहेत.त्यामुळे अन्य वाहनचालक, सोसायटीधारक व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत वेधले लक्ष विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्तावात हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी राज्यातील तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. अवजड वाहनांना दिवसभर वाहतूक बंदी केली; परंतु थोड्याच दिवसांत या नियमाचा विसर पडला आणि पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. या अवजड वाहनांना शहर हद्दीतून दिवसा वाहतूक करण्यास पुन्हा बंदी घातली जावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या बसेसही हडपसरला भेडसावणारी मोठी समस्या आहे, हे सांगत त्यांनी 15 नंबर, रविदर्शन ते गाडीतळ, मगरपट्टा कॉर्नर येथे बसेस रस्त्यावर उभ्या राहतात. वाहतूक पोलीस याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असून चिरीमिरी गोळा करत बघ्याची भूमिका घेत आहेत. यातून फक्त खासगी वाहतूक कंपन्यांचे हित जपले जाते आहे. पण, यात सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे,’ असे निदर्शनास आणून दिले.