Anjali Damania : पुण्यातील कोरगाव परिसरात असलेल्या जमीन प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. पार्थ पवार जमीन प्रकरण विरोधकांनी लावून धरले असून, या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. जमीन प्रकरणात पार्थ पवार संचालक असलेली अमेडिया कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांच्यावर आरोप काही केल्या थांबत नाही आहेत. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया य़ांनी पत्रकार परिषद घेत जमीन प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत. जमीन प्रकरणार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अंजली दमानिया यांनी मंगळवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी जमीन प्रकरणावर काही महत्वाचे कागदपत्रे बावनकुळे यांना सादर केले होते. आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत महत्वाची माहिती देत मोठे दावे केले आहेत. वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीवर दमानिया यांनी बोट ठेवले असून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मोठी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. काय म्हणाल्या अंजली दमानिया? वादग्रस्त जमीन प्रकरणावर अंजली दमानिया यांनी थेट भाष्य करत विविध मुद्यांना हात घालत कायदेशीर बारकावे मांडले. महसूल विभागाच्या आणि दुय्यम निंबधकांच्या भूमिकेवर दमानियांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का? गायकवाड कुटुंबियांच्या नावाने ही जमीन नाही, मग ते व्यवहार कसा करू शकतात? पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी शीतल तेजवानीकडे खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले. गायकवाड कुटुंबाच्यावतीने तेजवानींकडे सही करण्याचे अधिकार नाहीत. तर करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार, अमेडिया कंपनीकडे नसल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, असा आरोप दमानियांनी केला आहे. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे, असे देखील त्या म्हणाल्या आहेत. पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब FIR दाखल करा, अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केले आहेत. हेही वाचा : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण! सुरक्षा दलांची मोठी कारवाई ; कुलगाममधून आणखी एक डॉक्टर ताब्यात