पुणे-पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव येथील लॅंड बॅंकची मर्यादा पाहता उद्योगांनी नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी देखील गुंतवणुकीचा विचार करावा, असे आवाहन उद्योगमंत्री उद्य सामंत यांनी केले आहे. तसेच सध्या पुण्यात असलेल्या जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी तसेच नव्याने येणाऱ्या कंपन्यांना जमीन, पाणी आदी पायाभूत सुविधा, अनुदान, सवलती आदी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
पुणे शहरात जर्मन कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत गोलमेज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सामंत बोलत होते. यावेळी जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप करमन, मुंबई येथील जर्मनीचे महावाणिज्य दूत एकिम फॅबिग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, इंडो- जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक स्टेफान हालुसा यांच्यासह जर्मनीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून, जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरविल्या जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सामंत यांनी दिली. कंपन्यांच्या प्रकल्पांना मंजुरी आणि अन्य अनुषंगिक बाबींसाठी उत्कृष्ट अशी एक खिडकी प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. कंपन्यांनी येथील स्थानिक रोजगारनिर्मितीमध्ये मोठा वाटा उचलावा, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राकडून अधिकाधिक गुंतवणुकीचे स्वागत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन जर्मनीचे राजदूत डॉ. करमन म्हणाले, महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीमध्ये जर्मन कंपन्यांचा मोठा वाटा आहे. वाहननिर्मिती, सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांसह अन्य क्षेत्रातील कंपन्यांचीही येथे मोठी गुंतवणूक आहे. यापुढेही जर्मन कंपन्यांकडून गुंतवणुकीसाठी प्रयत्न होतील.
विजेची अडचण सोडविणार
कंपन्यांच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढील 15 दिवसांत मंत्रालयातील ऊर्जा विभागाच्या तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये कंपनीनिहाय विजेच्या अडचणींचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील. वाहतूक कोंडी, रस्ते यासह स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पोलीस तसेच संबंधित विभागांना सूचना देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.