पुणे : जिल्ह्यातील 266 गावांमध्ये ‘हाय अलर्ट’

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरांपेक्षा अधिक बाधित सापडत आहे. काही गावांमध्ये तर दररोज बाधित संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सर्व उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या कमी झाली नाही, त्या गावांना ‘हाय अलर्ट’ आणि अलर्ट गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये 266 गावांमध्ये ‘हाय अलर्ट’ ‘आणि अलर्ट’ गावे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये हाय अलर्ट गावे 159 तर अलर्ट गावे 107 आहेत.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 3 हजार 841 एवढे क्रियाशी प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू तर ग्रामीण भागात 2 लाख 14 हजार 161 रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाने करोनामुक्त करण्याचे उद्दिष्ठ ठेवले असून त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून रुग्णसंख्या नियंत्रण करण्याच्या उपाययोजनाच्या जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील सर्व्हे केल्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत या ठिकाणच्या रुग्णसंख्या वाढत आहे. अशी गावे हाय अलर्ट म्हणून घोषित करण्यात यावीत. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होत नाही ती गावे अलर्ट म्हणून घोषित करण्याबाबत जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दाखल केला होता. नगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमधील क्षेत्रात रुग्णसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गावे हाय अलर्ट जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील हाय अलर्ट गावांमध्ये हवेली, खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरुर तालुक्यातील नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामपंयातीचा समावेश आहे. तर अलर्ट गावांमध्ये आंबेगाव, बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरुर या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी रुग्णसंख्या कमी करण्याबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागात पूर्वी ज्या गावांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत होते आणि तेथील रुग्णसंख्या कमी होत नाही त्या गावांना ‘अलर्ट गावे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांगमध्ये नव्याने ‘हॉट स्पॉट’ गावांमध्ये रुग्ण वाढत आहे, त्यांना ‘हाय अलर्ट’ गावे जाहीर करण्यात आले आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी





