Pune Gramin : निसर्गसौंदर्याने नटलेला मुळशी तालुका सध्या पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे–कोलाड महामार्ग तसेच ताम्हिणी घाट परिसरात अनेक ठिकाणी फार्म हाऊस आणि विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे. ताम्हिणी आदरवाडी दरम्यान रस्त्याच्या कडेला अनेक झाडांची विना परवानगी झाडे तोडली असून यामुळे तालुक्यातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या वृक्षांची सर्रास तोड होत असल्याने भविष्यात गंभीर पर्यावरणीय परिणामांना सामोरे जावे लागू शकते. जंगलातील नैसर्गिक अधिवास कमी होत असल्यामुळे वन्यप्राणी असुरक्षित होत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचेही चित्र आहे. जंगलातील प्राणी गावाकडे येत असून, मानवी हस्तक्षेप जंगलांमध्ये वाढत असल्याने मानव–वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढत आहे. दरम्यान, मुळशीत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये, विशेषतः रिंग रोडसारख्या प्रकल्पांमुळे अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र या झाडांच्या बदल्यात शासनाकडून नव्याने वृक्षलागवड होणार का, लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, एखाद्या शेतकऱ्याने शेतीच्या कामासाठी लहान झाडे तोडल्यास वनविभागाकडून कायद्याचा बडगा उगारला जातो. मात्र विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. मुळशीचा निसर्ग आणि जैवविविधता जपण्यासाठी वनविभागाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ताम्हिणी आदरवाडी दरम्यान रस्त्यालगत तोडण्यात आलेली झाडे वीज महावितरण कंपनीच्या वतीने वायरमन यांनी तोडली आहे असे समजले असून संबंधित महावितरण विभागाला नोटीस काढली आहे. पुढील कार्यवाही सुरु असून यावर योग्य तो निर्णय वनविभागाच्या वतीने घेतला जाईल.