कडूस -महाराष्ट्रातील राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीचा राज्यभर (दि. 4) दुपारपर्यंत संप सुरू होता. आंदोलनामुळे गावोगावी समस्या होत्या; मात्र संप काळातही अभियंत्याने कडूस (ता. खेड) भागात माणुसकीचे दर्शन घडवले.
पश्चिम भागातील कडूस, दोंदे, आगरमाथा, रानमळा या गावात सकाळपासून नादुरुस्त लाइनमुळे वीजपुरवठा खंडित होता.
या भागातील सर्व कर्मचारी, अधिकारी आंदोलनात सहभागी असल्याने सर्वत्र पाणीपुरवठा बंद होता. कडूसचे महावितरण नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड यांनी खेड आणि मावळचे कार्यकारी अभियंता मनिष ठाकरे यांच्याशी संपर्क साधून नादुरुस्त लाइनमुळे उद्भवलेली पिण्याच्या पाण्याची समस्या कळविली.
ठाकरे यांनी गंभीरतेने दखल घेऊन, वीज खंडीत झालेल्या भागात पाहणी केली. स्वतःच्या जबाबदारीवर परमीट घेऊन, तसेच खेडच्या ठिकाणाहून सर्व फिडर बंद केले. दरम्यान, बाहेरील टीम बोलावून त्यांच्याकडून तुटलेली तार जोडून घेतली. त्यामुळे सहा तास बंद पडलेला वीजपुरवठा सुरळीत झाला.
अभियंता ठाकरे यांच्या अधिपत्याखाली खेड व मावळमधील एमआयडीसीचा संवेदनशील भाग असूनही त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे त्यांच्यातील माणुसकी दिसून आली. चारही गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.