बारामती/जळोची – छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात राज्यभर आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविरोधात सत्तेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत. जेव्हा त्यांच्या विचारांचे लोक बोलतात तेव्हा पाठराखण करण्याचे पाप भाजप करते, स्वतःच्या चुका, अपयश झाकण्यासाठी ते अजित पवार यांच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, इतिहासासंबंधी जर कोणाचे काही वेगळे मत असेल तर राज्यात अनेक इतिहासकार आहेत. आपण त्यांचे एक चांगले चर्चासत्र आयोजित करू शकतो. सत्तेतील लोकांकडे बोलण्यासारखे काही नाही. स्वतःच्या चुका, अपयश झाकण्यासाठी ते अजित पवार यांच्या विरोधात कट, कारस्थान करत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही.
देशाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे माझ्यासह विरोधी पक्षातील लोक सातत्याने सांगत आहेत. जगाच्या रिपोर्टमध्येही तशी नोंद झाली आहे. यामुळे भविष्यात निर्यातीला अडचण येईल. यानिमित्ताने मला सुषमा स्वराज यांच्या, जब रुपया गिरता है तब देश की प्रतिष्ठा गिरती हैं, हे शब्द आठवत असल्याचे त्या म्हणाल्या.
रुपयासमोर डॉलर अधिक ताकदवान होतेय यामुळे क्रूड ऑइल व अन्य बाबींच्या आयातीवरही मोठा परिणाम होईल. आजच इंधनाची भाववाढ केंद्र आणि राज्याने केली आहे. त्यामुळे अतिशय अडचणीच्या काळातून राज्य व देश चालले आहे.
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी या प्रश्नी आवश्यक ते सहकार्य करू. जगातील मोठ्या अर्थतज्ज्ञांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश होतो. त्यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन घेतले तर देश या स्थितीतून तरेल, असे त्या म्हणाल्या.