– उदय ब्राम्हणे/ शेरखान शेख
कोरेगाव भीमा/शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजय रणस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात जय भीमचा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. करोनाच्या सावटानंतर याठिकाणी नाताळ व रविवार असल्याने लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी आले होते. जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या नियोजनामुळे शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम शांततेत
पार पडला.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय रणस्तंभ परिसरात अभूतपूर्व वातावरणात प्रशासनाने दोन महिने गाव बैठका घेत सामाजिक सलोखा निर्माण केला होता. मानवंदनेसाठी समाज बांधवांमध्ये मोठी ऊर्जा होती. राज्यासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातून आंबेडकरी बांधव विजय रणस्तंभाजवळ एकवटला होता.
मराठवाडा, विदर्भातून आलेले कलाकार रस्त्याच्या कडेला, झाडाखाली सावलीत बसून प्रबोधनात्मक गाणी सादर करीत होती. नागरिकांना मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका रांगेत सोडण्यात येत होते. कडाक्याची थंडी असताना सुध्दा रात्रीपासून भीमसैनिकांनी गर्दी केली होती. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये वयस्कर, तरुणांसह महिला वर्ग व लहान मुलांची संख्या मोठी होती.
भरदुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलिसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी चार बाजुंनी रांगा करुन बाहेर पडण्यासाठी पाच रांगा करुनही मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने व्हीआयपी गेटमधूनही अनुयायांना सोडण्यात आले होते.
कोरेगाव भीमा येथे शनिवार रात्रीपासून सुरु असलेल्या गर्दीचा ओघ रविवारी पहाटेपासून वाढायला सुरुवात झाली होती. यात महाराष्ट्रासह विविध राज्यातून लोक येत होते. कोरेगाव भीमापासून पुणे नगर रस्त्याने रांगा लागल्या होत्या. तरुण कार्यकर्त्यांसह स्त्री पुरूषांची लक्षणीय गर्दी झाली होती.
यंदा गर्दीत उच्चांकी वाढ
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. अंदाजे 14 ते 15 लाख लोक अभिवादनासाठी याठिकाणी आले होते. दिवसभरात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भीमराज आंबेडकर,
आमदार अशोक पवार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, लातूरचे खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड, बापू पठारे, जोगेंद्र कवाडे, दलित पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार यांसह आदींनी अभिवादन केले असून प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.