रांजणगाव गणपती – श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या 96 एकर जागेमध्ये सर्व सुविधांयुक्त, अद्ययावत व सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, असे हॉस्पिटल उभारण्यासाठी व पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी 1935 मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आली. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून गावचा विकास होऊन रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे राज्याला महसूल मिळाला.
कुकडी, चास, घोड धरणाचे पाणी मिळाले. तालुक्यात सुबत्ता आली. लोकसंख्या अधिक असून औद्योगिकीकरणामुळे परप्रांतीय व्यवसाय व नोकरीसाठी येतात. नागरिकीकरणामुळे ग्रामपंचायतवर ताण येत आहे. पन्नास टक्के करवसुली मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतीला नागरिकांना सुविधा देता येत नाहीत. घनकचरा, ड्रेनेज व कर संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातील.
आमदार अशोक पवार म्हणाले की, अजित पवार यांना एक सुंदर व स्वच्छ इमारत पाहिजे असते. घोडगंगा कारखान्याचा विजय केवळ अजित पवार यांच्यामुळेच झाला आहे. त्यांचे नेतृत्व राज्याला लाभो ही महागणपतीला प्रार्थना करतो. कचरा प्रकल्पासाठी व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीकेश पवार, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब पाचुंदकर, माजी आदर्श सरपंच भिमाजी खेडकर, दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समितीचे सभापती वसंतराव कोरेकर, माजी सभापती प्रकाश पवार,
माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, कविता खेडकर, सविता बगाटे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, देवस्थानचे माजी अध्यक्ष दत्तोबा लांडे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य जाकिरखान पठाण, पंचायत समितीचे माजी सदस्य विक्रम पाचुंदकर, बाळासाहेबांची शिवसेना युवा जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संदीप शिंदे,
सदाशिव पवार, सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच स्वाती शेळके, चेअरमन उत्तमराव कुटे, महेश फंड, राजेश लांडे, संदीप कुटे, श्रीकांत पाचुंदकर, माणिक खेडकर, नितीन लांडे, सोमनाथ भुजबळ, स्वप्निल गायकवाड, संपत खेडकर, ग्रामसेवक गंगाधर देशमुख उपस्थित होते. अजय गलांडे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले. विक्रम पाचुंदकर यांनी आभार मानले.
बेरोजगारीबाबत राज्य शासन उदासीन
राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत पवार यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंजिनियर, डॉक्टर हे पोलीस भरतीसाठी दिसू लागले आहेत. ही राज्यासाठी खेदाची बाब आहे. सरकारला अजून कसलाच अंदाज येत नसल्याने काही दिवसांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशी टीका त्यांनी यावेळी केली.