पुणे –अकरावी प्रवेशाच्या पहिली गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
पहिल्या फेरीनुसार 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत होती. मात्र, प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक मागासर्गीय विद्यार्थ्यांकडे स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र नाही अथवा त्यासाठी अर्जही केलेला नाही. त्यामुळे प्रवेश घेणे अडचणीचे ठरत आहे. याचा विचार करून एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.
खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळालेला आहे, त्यांना जात प्रवर्गाबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करणे आवश्यक नाही. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे, त्यांनी त्याची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
ज्यांनी अद्यापपर्यंत अर्जच केला नाही, त्यांनी प्रवेशासाठी वडिलांचे जात प्रमाणपत्र आणि हमीपत्र सादर केल्यास ते विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील. या विद्यार्थ्यांना 30 दिवसांत स्वत:चे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील अन्यथा प्रवेश रद्द होतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत आहे.
विद्यार्थ्यांनी अलॉटमेंटनंतर “प्रोसीड फॉर ऍडमिशन’ केल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला व इयत्ता दहावी गुणपत्रक तसेच आवश्यक असल्यास नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र “स्टुडंट लॉगिन’मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता
अकरावी पहिल्या फेरीत 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी सायंकाळपर्यंत 29 हजार 460 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अजूनही आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत मिळाल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.