मुंढवा –केशवनगर गाव महानगरपालिकेत समाविष्ठ होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. परंतु, येथील नागरिक मूलभूत समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाहीत. पाणीप्रश्न, अखंडीत वीजपुरवठा, रस्ता रुंदीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, रस्त्यांवरील अतिक्रमणे, ओढ्या-नाल्यात कचऱ्याची दुर्गंधी, नदीपात्रात राडारोडा अशा अनेक समस्या असताना या परिसरातील नागरिकांनी गेल्या आर्थिक वर्षाचा तब्बल 10 कोटींच्या आसपास मिळकतकर भरला आहे. नागरिक प्रामाणिकपणे मिळकत कर भरत असताना सुविधा पुरविण्याकडे पालिकेचे मात्र दुर्लक्ष आहे.
केशवनगर ग्रामपंचायतीची 10 जुलै 2017 मध्ये मुदत संपल्यानंतर येथे प्रशासक नेमण्यात आले होते. यापूर्वी केशवनगर ग्रामपंचयात असताना साधारण 4 कोटींच्या आसपास नागरिक मिळकतकर भरीत होते. त्यावेळी सर्व सुख-सुविधा मिळत होत्या. केशवनगरचा पालिकेत समावेश झाल्यानंतर मिळकत करामध्ये मोठी वाढ झाली आहे.
केशवनगर महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या परिसरातून साधारण 10 कोटींच्या आसपास मिळकतकर नागरिकांकडून भरला जात असताना पालिकेला गेल्या पाच वर्षांत कोणतीही मूलभूत सुविधा ठोसपणे पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे मिळकतकर का भरायचा? असा प्रश्नही नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
या आहेत समस्या…
*अपुरा पाणी पुरवठा
*मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते अरुंद
*कचऱ्याची योग्य विल्हेवाट नाही
*अंतर्गत ड्रेनेजलाइनचे काम नाही
*आरोग्य सुविधा नाही
*विरंगुळा केंद्र नाही.
*उद्याने, क्रींडागण नाही