प्रभात वृत्तसेवा पुणे – जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची चांगलीच तापली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच इच्छुक उमेदवारांनी शासकीय कार्यालयाकडे पाठ फिरविली. १० नगरपरिषदा, २ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक गेला आहे. अद्याप अर्ज दाखल करण्यासाठी गती आली नाही. जिल्ह्यात बारामती, जेजुरी, सासवड, भोर, इंदापूर, दौंड, शिरूर, राजगुरूनगर, चाकण, जुन्नर, माळेगाव, मंचर नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.त्यातच नगरपरिषद, नगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. इच्छुकांनी तीन वर्षांपासून मशागत सुरू ठेवली होती. त्यात न्यायालयीन प्रक्रियेत या निवडणुका लांबत गेल्या होत्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदेच्या हद्दीत राजकीय हवा तापली आहे. मुहूर्तावर अर्ज दाखल होणार.. नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि.१०) पहिलाच दिवस होता. सकाळपासून कोणत्याही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यातच अपक्ष म्हणून उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. जिल्ह्यातील सर्वच बलाढ्या पक्षांकडून उमेदवारी जाहीर होणार असल्याने त्यात आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी जाणार असल्याचे समजते. शेवटच्या दोन ते तीन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी ज्योतिषांकडे धाव घेतली आहे. अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पाहूनच उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. कागदपत्रांची पूर्तता.. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयाची थकबाकी नसल्याचे दाखले काढण्यासाठी उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते नगरपरिषदेत गर्दी करीत आहेत. अर्ज भरताना सर्व निकष पूर्ण करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन केले जात आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर इच्छुक अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारीचा पेच सुटेना.. जिल्ह्यात जाहीर झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भोर, सासवड, जेजुरी, शिरूर, दौंड, इंदापूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात थेट लढती होणार आहेत. या दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे (दि.१४) नंतरच पक्षश्रेष्ठींकडून ग्रीन सिग्नल मिळणार आहे. त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहाचणार आहे.