वकील मंडळींचे आवाहन : लॉकडाऊन काळात पोलिसांना सहकार्य करा
पुणे – भाजीपाला, दूध, औषधे आणि किराणा ही नेहमीची करणे सोडून लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी नागरिक आता नवीन कारणे शोधू लागले आहेत. प्रामुख्याने आता घरात बसून कंटाळा आला आहे, पाय मोकळे करायचे आहे, घरात बसून वजन वाढले असून, कमी करण्यासाठी चालायला बाहेर जावे लागते. अशा एकापेक्षा एक कारणे देऊन नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करताना दिसत आहे. या सगळ्यांत नागरिकांची भूमिका काय ? त्यांचे कुठे चुकते याविषयी काही वकिलांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शेवटपर्यंत नागरिकांनी करोनाविरोधात लढा देणे गरजेचे असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले.
नागरिकांनी घराबाहेर येणे टाळावे. अद्याप कित्येकांना याचे गांभीर्यच कळले नाही. घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांनी करून देखील जे रस्त्यावर येताना दिसतात. ते मध्यम वर्गीय सुशिक्षित नागरिक नाहीत. इतर नागरिक आहेत. त्यांनी नियम पाळणे अपेक्षित आहे. यात सरकारी अधिकारी, कर्मचारी, तसेच खासगी सेवा क्षेत्रात काम करणारा वर्ग हा घराबाहेर पडलेला नाही. मात्र सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडून जीव धोक्यात घालत आहेत. या सगळ्यांत मात्र पोलीस, डॉक्टर, महापालिका अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी दिवसरात्र काम करून करोनाचा सामना करण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे.
– ऍड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ विधिज्ञ
नागरिकांनी सर्व गोष्टीचा विचार गांभीर्याने करायला हवा. करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीत डॉक्टर, पोलीस अधिकारी, कर्मचारी हे जीवावर उदार होऊन आपल्यासाठी काम करीत आहेत. त्यांना सर्वांनी सहकार्य करायला हवे. स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. विहित कारणाशिवाय बाहेर पडू नये. स्वत: आणि कुटुंबीय सुरक्षित कसे राहील हे पाहवे.
– एन. डी. पाटील धायगावे, प्रमुख जिल्हा सरकारी वकील.