समीर भुजबळ
वाल्हे – चालूवर्षी पुरंदर तालुक्याच्या सर्व गावांमध्ये पावसाळ्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके जळून खाक झाली होती. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुधन सांभाळणार्या शेतकर्यांची एकमेकांच्या नातेवाइकांकडे चारा मिळेल का चारा ? याबाबत शोधाशोध सुरू असल्याचे चित्र पुरंदर तालुक्यात आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर खरीप हंगामात बहुतांशी शेतकरी मका, बाजरी, कडवळ, हात्ती घास, मेथी घास आदी पिकांची लागवड प्रामुख्याने करतात. कारण, या पिकांपासून उत्पादन कमी मिळाले तरी चालेल; परंतु जनावरांसाठी वर्षभर लागणारा चारा उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा पशुपालक शेतकर्यांना असते. मात्र, यावर्षी अपेक्षेचा ही भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे. कारण, चालूवर्षी पावसाळ्यांच्या सुरुवातीस थोडाफार पाऊस पडल्याने शेतकर्यांनी बियाणे खरेदी करून मका, बाजरी, कडवळ सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली.
मात्र, पेरणीनंतर, पावसाने दडी मारल्याने व सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी असल्याने नद्या-नाले, ओढे, तलाव, बंधारे, विहिरींनाही पाणी आले नाही. परिणामी, या पिकांना पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून खाक झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच; परंतु केलेला खर्चही निघाला नाही. आता रब्बीच्या पेरण्या करण्याच्या तयारीत शेतकरी होता. मात्र, विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावली असल्याने, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्वारी, मका किंवा घसवर्णीय पिके घेणे आता गरजेचे असताना शेतकरी तसे धाडस करताना दिसत नाहीत. यावर्षी डोंगर माथ्यावरही गवत उगवले नसल्याने जनावरे चरण्यासाठी ही नेता येतं नाहीत.
असा मिळतो चारा.
पाणलोट क्षेत्रातील, तसेच ज्यांच्याकडे जनावरे नाहीत अशा शेतकर्यांकडे मका, कडवळ पिकांचा चारा उपलब्ध आहे; परंतु हा चारा मिळविण्यासाठी मका, कडवळ काढणी, कापणी व कणसे गोळा करण्यासाठी लागणारी मजुरी शेतकर्याला द्यावी लागते. यासाठी एकरी किमान सहा ते सात हजार रुपये खर्च येतो. एक एकरात साधारणतः दीड ते दोन ट्रॉली चारा उपलब्ध होतो. जनावरांचा चाराही उपलब्ध होऊ न शकल्याने जनावरे कशी सांभाळायची, याबाबत चिंता आहे.
पाच ते सहा हजार रुपये ट्रॉली
अनेक पशुपालक शेजारील दौंड, बारामती, पुरंदर व भोर तालुक्याच्या सीमेवरील काही गावातील तसेच पुणे- सातारा जिल्ह्यातील सीमेवरील गावातील नातेवाइकांकडे चारा मिळविण्यासाठी शोधाशोध सुरू असून, मिळेल त्या किंमतीत चारा जमा करण्यासाठीची लगबग सुरू आहे. वाहतूक खर्च बघता पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत एक ट्रॉली चारा उपलब्ध होत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
“चालूवर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच, जनावरांना किमान चार महिने पुरेल इतकाही चारा शेतातून मिळालेला नाही. जनावरांसाठी, दुसर्यां तालुक्यातील गावाहून चारा विकत घेण्याची वेळ आली आहे.” – नारायण पवार, पशुपालक, सुकलवाडी
“राज्य शासनाने पुरंदर तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर केला आहे. आमच्या परिसरात नेहमीच दुष्काळ असतो; पण कोणतीही लाभ मात्र मिळत नाही; यावर्षी जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत; अन्यथा चारा उपलब्ध होत नसल्याने, पशुधन विक्रीस काढण्याशिवाय तसेच, हे पशुधन कवडीमोल किंमतीत विकण्या शिवाय पशुपालकास पर्याय उरणार नाही.” – भाऊसाहेब पवार, पशुपालक शेतकरी वाल्हे (ता. पुरंदर) : येथील विहीरीने गाठलेला तळ.