जवळार्जुन -पुरंदर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींपैकी 68 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुरंदर तालुका व जिल्हा पातळीवरील नेते गावपातळीवरील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना आदेश देणार की “दिशा’ दाखवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पुरंदर तालुक्यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे हे पक्ष राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत.
मागील दहा वर्षांच्या काळात शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यावर पकड मजबूत केली होती. जनमताच्या बळावर शिवतारे यांनी गावागावांत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहात आणून पाठबळ दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने पंचायत समिती व जिल्हा परिषद गटांमध्ये दमदार यश खेचून आणले आहे. ग्रामपंचायतीतील त्यांची ताकद देखील दखलपात्र आहे.
गेल्यावर्षी राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याने महाविकास आघाडीत शिवसेना हा केंद्रस्थानी आहे. त्यामुळे शिवतारे यांच्या गटाचे नेते कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्यात उत्सुकता आहे. पुरंदर तालुक्यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सुद्धा प्रबळ पक्ष आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. जरी हा तालुका मागील चाळीस वर्षांत माजी मंत्री दादा जाधवराव यांच्या विचाराला अनुसुरून चालणारा होता.
मात्र, गेल्या दहा वर्षांत माजी मंत्री शिवतारे यांनी जनसंपर्कातून मोट बांधत पुरंदरच्या गडावर भगवा फडकाविला होता. त्याचवेळी शरद पवार यांनी पुरंदरच्या गडात पवार समर्थकांना चांगलेच बळ दिले आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हे पवार कुटुंबीयांना मानणारे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची फौज उभी केली आहे. त्यांना रसद पुरविली आहे. याची प्रचिती प्रत्येक निवडणुकीत येत आहे.
पवार, खासदार सुळे यांनी तालुक्यातील नेत्यांना विकासकामे करण्यासाठी पाठबळ दिले आहे. तसेच राष्ट्रवादीची दिग्गज नेतेमंडळी तालुक्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी पाठपुरावा करतात. हे महत्त्वाचे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुरंदरचे राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. त्यावेळी पुरंदर तालुका हा कॉंग्रेससाठी सोडण्यात आला. कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या विजयासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि एकजुटीने काम केले होते. त्यामुळे जनतेने पुरंदरचा कारभारी बदलला.
दहा वर्षांची माजी मंत्र्यांची सत्ता संपुष्टात आणली. आमदार संजय जगताप हे महा विकास आघाडीचा घटक म्हणून तळागाळात पोहोचले आहे. गेल्या वर्षभरात ते विकासकामांवर लक्ष केंद्रीत करून मार्गी लावत आहेत. त्यामुळे पुरंदरमधील कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. एकप्रकारे कॉंग्रेसला बुस्टर डोसच मिळाला आहे. आमदार जगताप यांनीदेखील पुरंदरच्या गावागावांत कॉंग्रेसचे जाळे निर्माण केले आहे. प्रत्येक गावांमध्ये कॉंग्रेसची ताकद निर्माण झाली आहे.
अजित पवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना जिल्हा आणि तालुका पातळीवर पदे देऊन ताकद दिली आहे. माजी आमदार अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, विजय कोलते. माणिकराव झेंडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ताजी चव्हाण, बाबुसाहेब माहुरकर, संभाजीराव झेंडे, शामकांत भिंताडे आदी दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचा पाया भक्कम केला आहे.
तालुक्याच्या दृष्टीने गुंजवणीचे पाणी, विमानतळ, पालखी मार्ग, बेलसर- उरळी कांचन रस्ता हे नेहमीच चर्चेत येतात. यातील मोठ्या संवेदनशील मुद्द्यांचे पडसाद गावपातळीवर पडत आहेत. वाघापूर, माळशिरस, नीरा, बेलसर, वाल्हे ही गावे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची आहेत. तालुक्यात अनेक गावांत लक्षवेधी लढती होण्याचे संकेत आहेत.
मिनी मंत्रालयात एकोपा दिसणार का?
पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले आहे. गावपातळीवरील गावाचे मंत्रालय समजल्या जाणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्ते एकत्र येणार काय, याची चर्चा जोर धरू लागली आहे.
अनेक गावांत राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसची ताकद दखलपात्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोधचा पायंडा तीन पक्षांतील नेते समन्वयातून पार पाडू शकतात. तसेच हा पुरंदरचा पॅर्टन जिल्ह्यात आदर्शवत ठरणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही भावकी, गावकी, गटतट,वाडा, नातेवाइक, मित्रपरिवार यावर होणार आहे.