सहा महिन्यांत तब्बल 17 विद्युत रोहित्र चोरीला : शेतकरी चिंतेत
हनुमंत चिकणे
उरुळी कांचन – पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, नायगाव, बिवरी परिसरात विद्युत रोहित्र चोरट्यांनी पुन्हा एकदा रोहित्र चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी मागील सहा महिन्यांत तब्बल 17 विद्युत रोहित्र फोडून, रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चोरट्यांनी लोकवस्तीपासून दूर असणार्या विद्युत रोहित्रांना टार्गेट केले असून, यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी हतबल दिसून आहे. तर दुसरीकडे नदी कालव्यातून मुबलक प्रमाणात पाणी वाहत असूनही चोरट्यांच्या करामतीमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्युत रोहित्र निर्जन ठिकाणी असल्याने ते बसवले की, लगेच फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केली जात आहे.
कोरेगाव मूळ परिसरातील तांबे वस्ती येथील रोहित्र बसवले ते तिसर्या दिवशी चोरून नेल्याची ताजी घटना घडली आहे. अजूनही पूर्व हवेलीत विद्युत रोहित्र चोरीचा सपाटा सुरू असल्याने यामागचा मुख्य सूत्रधार शोधण्याचे आवाहन लोणी काळभोर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. विद्युत रोहित्र चोरीला जाऊ नये म्हणून रोहित्राला महावितरण विभागाच्या वतीने वेल्डिंग करण्यात येत आहे; परंतु आता चक्क चोरटे वेल्डिंग तोडून विद्युत रोहित्र चोरून नेत असल्याने शेतकर्यांसह महावितरणच्या अधिकार्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
थ्री फेज वीजपुरवठा सुरु असताना रोहित्राची चोरी करणे म्हणजे मृत्युशी खेळ करण्यासारखे आहे; परंतु चोरटे हे काम अतिशय खुबीने करत आहेत. यामुळे हे चोरटे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत. रोहित्र चोरी केल्यानंतर तांब्याची तार, इन्सुलेटीव्ह ऑइल चोरीस जात आहे. एका डिपीमधील ऑइल आणि धातूची किंमत अंदाजे दीड ते 2 लाखापर्यंत असते.
शेतकर्यांच्या अडचणीत वाढ
विद्युत रोहित्र नसल्याने शेतकर्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, रब्बी पिके, कांदा, भाजीपाला, यासारखी नगदी पिके आहेत. हिवाळ्याचे असले तरी मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे. त्यामुळे पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवण्याची गरज असते. तसेच पाण्याची कमतरता जाणवल्यास फळशेतीचे नुकसन होऊन शेतकर्याचे वर्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता असून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारंवार रोहित्र चोरीच्या व लाईटची बोंब असल्याने पाणी असून शेतीसाठी पाणी देता येत नाही. मागील पंधरा दिवसात आमच्या परिसरातील रोहित्र चोरून नेले आहे. तसेच घरची 100 फूट बोअरमधील मोटर चोरून नेण्याचा प्रयत्न झाला; परंतु जमिनीत अडकल्याने ती वाचली आहे.
-बाळासाहेब चौरे, प्रगतशील शेतकरी टिळेकरवाडी
पूर्व हवेलीतील मुळा मुठा काठावरील शेतकरी ट्रान्सफॉर्मर चोरी, केबल चोरी, मोटार चोरी, पिकांच्या चोरी अशा गोष्टींना शेतकरी घायाळ झाला आहे. तरी शासनाने व पोलीस खात्याने त्वरित त्याकडे लक्ष देऊन अशा गुन्हेगारांना धडा शिकवावा.
-पोपट साठे, शेतकरी भवरापूर
मागील सहा महिन्यांच्या काळात 17 रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी झाली आहे, ही बाब खरी आहे. या तारांच्या चोरीमुळे महावितरणाचे 10 लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. रोहित्र बसविताना वेल्डिंग करून बसवत आहोत; मात्र रात्रीच्या वेळी थ्री फेज लाइट गेल्यानंतर हे रोहित्र चोरी जात आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांना गस्त वाढण्याचे पत्र लवकरच देण्यात येणार आहे. तसेच शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने विद्युत रोहित्र त्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
-धम्मपाल पंडित, उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन