श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) : येथे स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग दाखवताना सरपंच मंजुषा धुमाळ, संतोष धुमाळ, ऋषिकेश धुमाळ व त्यांचे शेतकरी मित्र.
प्रवीण नवले
परिंचे – श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) गावच्या नवनिर्वाचित सरपंच मंजुषा संतोष धुमाळ व चुलत दीर ऋषिकेश बाळासाहेब धुमाळ यांनी एकत्र कुटुंब पद्धतीतून 25 एकर शेती फुलवली आहे.त्यांच्या शेतात ऊस, टोमॅटो,काकडी, ढोबळी आदी पिके वर्षांनुवर्षे घेतली जात असून या पिकांना बगल देत या वर्षी एक एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला आहे. पुरंदरच्या वातावरणात स्ट्रॉबेरी पिकाला चांगला बहर आला असून मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली आहे.
एकत्र कुटुंब पद्धतीमधील ताकद, आपापसात असणारा संवाद व काटेकोर नियोजन, कष्ट करण्याची जिद्द व धाडस यामुळे कोणतीही गोष्ट सहज शक्य होत. श्री नाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष प्रल्हाद धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेतीचे व पिकांचे नियोजन केले जात असल्याचे मंजुषा धुमाळ यांनी सांगितले.
पूर्व मशागत व खत व्यवस्थापन
स्ट्रॉबेरी लागवड करण्यापूर्वी जमीनीची पूर्व मशागत करून सहा ट्रॉली शेणखत व शंभर पिशव्या कोंबडी खत टाकून बेड काढून घेतले लागवड करायच्या आधी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला पाण्याची कमतरता लक्षात घेऊन ठिबक सिंचनाचा वापर केला. दोन दिवस ठिबक संच सुरू ठेवून वाफसा झाल्यावर रोपांची लागवड केली.आठ दिवसांच्या अंतराने दोनवेळा बुरशीनाशक व पांढर्या मुळांची वाढ होण्यासाठी ड्रींगचिंग केले. दर आठ दिवसांनी किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची मात्रा दिली आहे.
आतापर्यंत तीन लाख खर्च
सातारा जिल्ह्यातील वाघोली येथे रहाणारे पाहूणे दर वर्षी स्ट्रॉबेरी शेती करुन लाखो रुपयांचे उत्पन्न काढत आहेत. आम्ही स्ट्रॉबेरी शेती करताना त्यांचे मार्गदर्शन घेतले पुरंदर तालुक्यात उष्ण हवामान असल्याने वेंटर डाऊन जातीची निवड केली. प्रती रोपाची किंमत सात रुपये होती. एक एकर क्षेत्रावर 20 हजार रोपांची लागवड केली आहे. पंचवीस दिवसांनी मलचिंग पेपर अंथरूण घेतला. फुल धारणा झाल्यावर झाडांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने नियमित औषध फवारणी करावी लागते. स्ट्रॉबेरीचे उत्पन्न सुरू होईपर्यंत 3 लाख रुपये खर्च आला आहे. प्रती रोपा पासून दीड ते दोन किलो स्ट्रॉबेरी फळ मिळणे अपेक्षित आहे.
15 लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार
सध्या शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो असा बाजारभाव आहे. एका रोपा पासून आर्धा किलो स्ट्रॉबेरी मिळाली तरी दहा टन उत्पादन मिळणार आहे. बाजारभाव कमी झाला तरी 15 लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याचे ऋषिकेश धुमाळ यांनी सांगितले फळ काढणीचे काम खुप किचकट व नाजूक आहे यासाठी मजुरांची संख्या जास्त लागते. आमचे बागायती क्षेत्र जास्त असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आठ कुटुंब मजुरीसाठी आमच्याकडे वास्तवास आहेत. मजुरीपेक्षा त्याच्या बरोबर कौटुंबिक नाते तयार झाल्यामुळे घरच्या शेतात काम करत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक शेतकर्यांना मजुराची कमतरता भासत असली तरी आम्हाला मजुराची चिंता वाटत नसून त्याच्या जिवावर कोणतेही पिक करण्याचे धाडस आम्ही करत असल्याचे ऋषिकेश धुमाळ म्हणाले.